रांची : झारखंडमध्ये आज २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ज्या २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी २५ केंद्रीय समिती सदस्य मिसिर बेसरा उर्फ सागर जी, असीम मंडल यांच्या पथकातील शीर्ष कमांडर आणि मारक दलाचे सदस्य आहेत. हे सर्व कोल्हान आणि सारंडाच्या दुर्गम जंगल-पहाडी भागांत सक्रिय होते.
आत्मसमर्पण करणा-यांमध्ये ६ उप-विभागीय समिती सदस्य, ६ क्षेत्र समिती सदस्य आणि १३ दलाचे सदस्य समाविष्ट आहेत. यासोबतच गुमला जिल्ह्यात सक्रिय असलेल्या जेजेएमपी संघटनेच्या २ नक्षलवाद्यांनीही शस्त्रे खाली ठेवली आहेत. पोलिसांनुसार, हे सामूहिक आत्मसमर्पण राज्यात नक्षलवादी कारवाया कमकुवत होत असल्याचे संकेत आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी ८ जणांवर एकूण ३३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या सर्वांविरुद्ध विविध जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, सतत चालवल्या जाणा-या मोहिमा आणि कठोर कारवाईमुळे नक्षलवादी दबावाखाली आहेत. झारखंड पोलिसांच्या रणनीतीचा परिणाम असाही दिसून आला की तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्येही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. अधिका-यांचे मत आहे की अशा आत्मसमर्पणामुळे संघटनेची रचना कमकुवत होते आणि नवीन तरुणांच्या भरतीवरही परिणाम होतो. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत सुविधा पुरवल्या जातील, जेणेकरून ते समाजाच्या मुख्य प्रवाहात परत येऊ शकतील.
१६ शस्त्रे आणि २८५७ गोळया सुपूर्द
आत्मसमर्पणादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर मोठया प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळाही जमा केला. एकूण १६ शस्त्रे आणि २८५७ गोळया माओवादी नक्षलवाद्यांनी सुपूर्द केल्या, तर जेजेएमपीच्या नक्षलवाद्यांनी एक इन्सास रायफल आणि १३० राउंड गोळ्या जमा केल्या. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये इंसास रायफल आणि मॅगझिनचाही समावेश आहे. पोलिस अधिका-यांच्या मते, ही जप्ती नक्षलवादी नेटवर्क कमकुवत करण्यात महत्त्वाची ठरेल. सुरक्षा यंत्रणांचे मत आहे की, अशा मोठ्या आत्मसमर्पणामुळे या भागात शांतता प्रस्थापित होण्यास बळ मिळेल.
















