नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणारी देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा नीट यूजी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ३ मे रोजी परीक्षा पार पडली, पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटली होती, अशी माहिती समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणी संसदीय समितीने एनटीएचे संचालक (नीट परीक्षा घेणारी संस्था) अभिषेक सिंह आणि चेअरमन प्रदीप कुमार जोशी यांची चौकशी केली. यावेळी एनटीएच्या संचालकांनी प्रश्नपत्रिका फुटली नाही, तर त्यातील काही प्रश्न बाहेर आले असे उत्तर दिल्यानंतर समिती संतापली.
संसदीय समितीच्या बैठकीत राधाकृष्णन समितीच्या शिफारशी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. जेव्हा समितीतील खासदारांनी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली कशी, असा प्रश्न विचारला तेव्हा एनटीएचे संचालक म्हणाले की, आमच्याकडून कोणताही पेपर फुटला नाही आणि याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. एनटीएच्या संचालकांनी दिलेल्या उत्तरानंतर समितीतील अनेक खासदार भडकले. ते म्हणाले की, जर एनटीएच्या यंत्रणेकडून पेपर लीक झाला नाहीये, तर मग सीबीआय तपास कशाचा करत आहे? या प्रश्नावर एनटीएचे संचालक शांत बसले.
एनटीएचा स्वत:ला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न
एनटीएकडून स्वत:ला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, सरकारने याआधीच कबुली दिली आहे की, नीटचा पेपर फुटला आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. नीट पेपर कुणाकडून आणि कशा पद्धतीने लीक करण्यात आला. तो किती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला, याचा तपास सीबीआय करत आहे.
नीटची परीक्षा पुन्हा का घेतली जात आहे?
संसदीय समितीतील सदस्यांनी एनटीएलाच चौकशीच्या फे-यात घेतले. एनटीए या प्रकरणात दोषी नाहीये, तर मग परीक्षा रद्द का झाली आहे? असा प्रश्न समितीकडून विचारण्यात आला. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका दहा दिवस आधीच फुटली होती. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची पीडीएफ अनेकांना पुरवण्यात आली. या प्रकरणात लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यालाही अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक जणांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे.
















