लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी दुचाकी अपघातांमध्ये दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून, या दोन्ही घटनांनी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अपघातांमध्ये हेल्मेटचा योग्य वापर झाला नसल्याचे निष्पन्न झाले असून, वेळेत आणि योग्य पद्धतीने हेल्मेटचा वापर केला असता कदाचित या दोन्ही व्यक्तींचे प्राण वाचले असते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत रस्ते सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधासाठी सातत्याने विविध जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, महामार्ग, चौक, सामाजिक कार्यक्रम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनचालक या सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.
रेणापूर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरूनगर तांडा परिसरात घडलेल्या अपघातात रामेश्वर अकुंश चीलरगे (रा. तत्तापूर, ता. रेणापूर) यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, ते आपल्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना पाठीमागून आलेल्या दुस-या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, संबंधित दुचाकीस्वाराकडे हेल्मेट होते; मात्र ते डोक्यावर परिधान न करता वाहनाला अडकविण्यात आले होते. म्हणजेच हेल्मेट जवळ असूनही त्याचा प्रत्यक्ष सुरक्षेसाठी वापर करण्यात आलेला नव्हता. अपघाताच्या वेळी हेल्मेट डोक्यावर असते तर डोक्याला झालेली गंभीर दुखापत टाळता आली असती आणि जीव वाचण्याची शक्यता अधिक होती.
दुसरी घटना भादा पोलीस ठाणे हद्दीत घडली. मारुती एकनाथ सूरवसे (वय ३२, रा. शिवली, ता. औसा) हे दुचाकीवरून जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, त्यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. परिणामी अपघातात डोक्याला झालेला मार जीवघेणा ठरला. साधारणत: अशा प्रकारच्या अपघातांमध्ये हेल्मेट हा जीव आणि मृत्यू यामधील महत्त्वाचा संरक्षण कवच ठरतो. मात्र त्याचा वापर न झाल्याने एका कुटुंबाने आपला तरुण सदस्य गमावला.
















