नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात एटीएममध्ये रोख रक्कम अर्थात कॅशचा प्रचंड तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. देशात अनेक भागांत असलेल्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांना एटीएममधून पैसे काढता येत नाहीत. एटीएममध्ये जमा करण्यासाठी बँकांकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने हे संकट ओढवले आहे. याची गंभीर दखल घेत एटीएम क्षेत्रातील शिखर संस्था पॅटमीने चिंता व्यक्त करत इंडियन बँक असोसिएशनला (आयबीए) पत्र लिहून तात्काळ मदत करा, अशी विनंती केली आहे. दरम्यान, अनेकदा एटीएम मशिन चालत नाहीत आणि जिथे कॅश भरण्यासाठी मशिन बसविल्या आहेत, त्या पण धड चालत नाहीत. त्यामुळे अनेकदा ग्राहकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
ग्राहकांसाठी लागणारी रोकड आणि बँकांकडून प्रत्यक्षात मिळणारा पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात ९४ हजार कोटी रुपयांची गरज असताना बँकांकडून केवळ ६१ हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ ६४ टक्के रक्कम मिळाली. एप्रिल महिन्यातसुद्धा अशीच परिस्थिती होती. ९४ हजार कोटी रुपयांऐवजी केवळ ५४ हजार कोटी रुपये म्हणजेच केवळ ५७ टक्के रक्कम एटीएममध्ये जमा करण्यात आली होती. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीची रीतसर माहिती आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागालाही देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात दखल घेऊन बँकांना आवश्यक तेवढा कॅश उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अनेक बँकांना एटीएमचा खर्च परवडेनासा झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने कॅश व्हॅनद्वारे एटीएमपर्यंत पैसे पोहोचवण्याचा खर्च वाढला आहे. एटीएम सुरक्षा रक्षक आणि कर्मचा-यांच्या पगाराचा बोजा वाढला आहे. ऑपरेशनलचा खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी ठरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एटीएम केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. ब-याचदा तर तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होताना दिसत आहे.
५ राज्यांत एटीएम
सेवा विस्कळीत
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या ५ राज्यांत एटीएम सेवा विस्कळीत झाली आहे. कर्नाटकात केवळ रोख रक्कम ३६ टक्के उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशात ३९ टक्के, तेलंगणात ४१ टक्के, मिझोराममध्ये ४१ टक्के, अरुणाचल प्रदेशात ४८ टक्के रोख रक्कम एटीएममध्ये उपलब्ध आहे.
वाढत्या शुल्कामुळे
ग्राहकांची पाठ
एटीएम वापरण्याच्या शुल्कात वाढ झाली आहे. २१ रुपयांवरून २३ रुपये झाले आहे. गेल्या वर्षी ४९.८४ कोटी एटीएममधून काढण्यात आले होते. एकूण व्यवहारांचे मूल्यही २.६४ लाख कोटींवरून २.५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. वाढत्या शुल्कामुळे ग्राहकांनी एटीएमकडे पाठ फिरवली आहे.
















