लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील २६ केंद्रांवर सुमारे १४ हजार ५०० विद्यार्थ्यांची आज दि. २१ जून रोजी ‘नीट’ परीक्षा होणार आहे. लातूर शहरात १९ तर उदगीर, निलंगा, अहमदपूर, चाकुर तालुक्यातील चापोली येथे ७ परीक्षा केंद्र असणार आहेत. ही परीक्षा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीआरपीएफ यांच्या निगराणीखाली होणार असून परीक्षेवर नियंत्रण एनटीएऐवजी पीएमओ ऑफिसचे राहणार असल्याने सर्व यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे.
नीट परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमही स्थापन करण्यात आली आहे. नीट परीक्षा पार पडेपर्यंत कडक संरक्षण राहणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांस ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व लातूर येथील नीटच्या परीक्षेवर विशेष लक्षठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या परीक्षेसंबंधी कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले आहे. नीट परीक्षा केंद्र परिसरासह आतदेखील मोबाईल वापरास पूर्णत: बंदी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वतंत्र बैठका घेऊन यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत. येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात होणा-या नीट परीक्षेसाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.
या तयारी संदर्भात जिल्हा पोलिस प्रशासन व सीआरपीएफ यांचा समावेश आहे. या तयारीसाठी पोलिस प्रशासनातर्फे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस इन्स्पेक्टर समाधान चवरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर हांगे तसेच पोलिस अंमलदार साखरे, अविनाश शिंदे काम पाहत आहेत. यांच्यासोबत पीएसआय वाघमारे, सीआरपीएफ जवान शर्मा तसेच एस. एन. उदारे, एस. जी. कांबळे, एस. पी. सूर्यवंशी उपस्थित आहेत. या नीट परीक्षेसाठी महाविद्यालयातर्फे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, पर्यवेक्षक डॉ. हेमंत वरुडकर, प्रा. विजयकुमार मांदळे हे काम पाहत आहेत.या परीक्षेसाठी चोक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
















