अकोला : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका ३०तारखेला घेतील. जरांगेंनी ३० तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
(दिवर समाज)
गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मडावी
(गौंड समाज)
चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले (तेली समाज)
बुलडाणा – वसंत राजाराम मगर
(माळी समाज)
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
(राखीव)
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंखे
(कुणबी)
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग प्रतापराव पवार (बंजारा)
नागपूर – काँग्रेसला समर्थन
सांगली – ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे लढत असतील तर त्यांना पाठिंबा देणार
मुस्लिमांना उमेदवारी, जैन समाजातलाही उमेदवार
भाजपाने मुस्लिमांच्या आयसोलेशनचे राजकारण सुरू केले आहे. त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवारसुद्धा उतरवायचे आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. जैन समाजाचाही उमेदवार उतरवरून त्याला जिंकून आणायचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर समाजाची नवीन वाटचाल आम्ही या माध्यमातून मांडत आहोत. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी आमची अपेक्षा आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.