रिधोरे (अतुल गवळी) : तब्बल पावणे दोन महिने पावसाने पाठ फिरवल्यानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सोडलेले पाणी अखेर सीना नदीत दाखल झाले असून, रविवारी दुपारी हा प्रवाह रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पोहोचला. नदीत पाण्याचा प्रवाह दिसताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या हंगामात संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेला. जुलै महिनाही संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी ऊस, केळी, डाळिंब, मका, तूर, कांदा तसेच इतर नगदी आणि फळबाग पिकांवर पाण्याअभावी गंभीर संकट ओढवले होते. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत होते.
शेतकऱ्यांच्या मागणीला यश
जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई आणि शेतीसमोरील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत १४ जुलै रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीसाठी पाण्याची निकड याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १६ जुलैपासून उजनी धरणाच्या मुख्य डाव्या व उजव्या कालव्यांसह भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या निर्णयाचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसून येत असून, कालव्यातील पाणी सीना नदीपर्यंत पोहोचले आहे.
नदीला मिळाले नवजीवन
रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचताच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नदीत आलेल्या या प्रवाहामुळे विहिरी, बंधारे आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढून पिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी महापूर, यंदा दुष्काळ
विशेष म्हणजे, गतवर्षी याच सीना नदीला महापूर आला होता. त्या वेळी तूर, सोयाबीन, कांदा, मका, ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट असून, पावसाअभावी नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. अशा वेळी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांसाठी मोठे ‘जीवदान’ ठरत आहे.
लाखो एकर शेतीला मिळणार दिलासा
सीना नदीत दाखल झालेल्या या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील लाखो एकर शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास करपू लागलेली पिके सावरण्यास मदत होईल, तसेच खरीप हंगामातील नुकसान काही प्रमाणात टळू शकते. दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष अजूनही आकाशाकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास शेतीला नवे बळ मिळेल आणि दुष्काळसदृश परिस्थितीतून जिल्ह्याची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
















