जळकोट (पाटोदा बु.): जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु.) येथे २ जून रोजी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी विहिरीत गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रमजान बोंडुंगे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान बोंडुंगे आपल्या मित्रांसोबत दुपारी तीनच्या सुमारास गावाजवळील एका शेतात असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता. रमजानला पोहता येत होते. बराच वेळ पोहल्यानंतर, “आता एक शेवटची उडी मारतो आणि मग गावाकडे जाऊ,” असे म्हणून त्याने विहिरीत उडी मारली. मात्र, उडी मारल्यानंतर तो पाण्याबाहेर आलाच नाही.
शोधकार्यात अपयश आणि अखेर दुर्दैवी अंत
मित्रांनी बराच वेळ वाट पाहिली, परंतु रमजान बाहेर न आल्याने त्यांनी तात्काळ घरी माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले, परंतु यश आले नाही. त्यानंतर विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. अखेर, माळी हिप्परगा येथील शेतकरी पांडुरंग तिडके यांनी जिवाची बाजी लावत विहिरीत उतरून रमजानचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि रमजानचा मृत्यू झाला होता.
गावात शोककळा
उडी मारल्यानंतर रमजान विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळात फसला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रमजान हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने पाटोदा गावात शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















