मोहोळ (रजनीश कसबे) : रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल असलेली कमालीची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चक्क उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांच्या खालून सरपटत जाऊन आपली ट्रेन पकडावी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, खुद्द स्टेशन मास्तरांनीच प्रवाशांना असा जीवघेणा सल्ला दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.
सोलापूर-पुणे पॅसेंजरने प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी रात्री १ च्या सुमारास मलिकपेठ स्थानकावर जमले होते. या स्थानकावर एकूण तीन रेल्वे मार्ग (पटरी) आहेत. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर आधीच दोन मालगाड्या किंवा इतर गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. नियमानुसार पॅसेंजर गाडी प्लॅटफॉर्मला लागणे अपेक्षित असताना, रेल्वे प्रशासनाने ती गाडी मधल्या राखीव रुळावर (मिडल लाईन) उभी केली.
दोन्ही बाजूला गाड्या उभ्या असल्यामुळे प्रवाशांना मधल्या रुळावर असलेल्या पॅसेंजरपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. यावेळी संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे दाद मागितली असता, त्यांनी प्रवाशांना चक्क “उभ्या असलेल्या गाडीच्या डब्याखालून पलीकडे जा आणि गाडीत बसा” असे बेजबाबदार उत्तर दिले.
स्थानकावर पादचारी पूल (FOB) उपलब्ध आहे, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला गेल्या दोन-तीन दिवसांपासून रेल्वे गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुलाचा वापर करूनही थेट प्लॅटफॉर्मवर उतरता येत नव्हते. अखेर नाईलाजास्तव लहान मुले, महिला आणि वृद्धांना रात्रीच्या अंधारात उभ्या असलेल्या रेल्वेच्या चाकांमधून आणि डब्याखालून सरपटत जीव धोक्यात घालून पॅसेंजर गाठावी लागली.
हा प्रकार मलिकपेठ स्थानकावर नवीन नसून वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिक प्रवाशांनी सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या ‘अजब’ नियोजनामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
“रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या जिवाची काहीच किंमत उरलेली नाही का? स्टेशन मास्तरांनी डब्याखालून जाण्यास सांगणे हे अत्यंत संतापजनक आहे. जर त्याच वेळी उभी असलेली गाडी अचानक सुरू झाली असती, तर होणाऱ्या भीषण अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार राहिले असते का?”
— संतप्त प्रवासी, मलिकपेठ
प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हा प्रकार थांबवावा आणि प्रवाशांना सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवरून गाडीत चढता येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
















