मुंबई/पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्र कडक उन्हाच्या झळा सोसत असतानाच, राज्यावर विशेषत: मराठवाडा आणि इतर ग्रामीण भागांवर तिहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे तीव्र पाणीटंचाई, दुसरीकडे शेतीकामाच्या ऐन हंगामात निर्माण झालेला डिझेल तुटवडा आणि त्यातच भर घालणारे अघोषित लोडशेडिंग यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या तिहेरी संकटामुळे बळिराजा संकटात सापडला आहे.
पाणी, वीज आणि इंधन या तीनही जीवनावश्यक घटकांसाठी ग्रामीण भागाला सध्या संघर्ष करावा लागत आहे. सरकारने या तिहेरी संकटाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा आणि अघोषित लोडशेडिंग त्वरित थांबवून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी आता ग्रामीण भागातून होत आहे.
मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना सध्या वेग आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. शेतकरी आपल्या ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लावून उभे आहेत. अनेक तास प्रतीक्षा करूनही शेतक-यांना शेतीच्या कामासाठी कॅनभर डिझेल देखील मिळणे कठीण झाले आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर जागच्या जागी उभे असल्याने शेतीची मशागत आणि पेरणीपूर्व कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.
पाण्यासाठी वणवण
यंदा उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून ग्रामीण भागात जलसाठे तळ गाठू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. महिला आणि बालकांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्याने पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
अघोषित लोडशेडिंग
वीज वितरण कंपनीच्या अघोषित लोडशेडिंगने ग्रामीण भागातील अडचणींमध्ये आणखी भर घातली आहे. विहिरीत पाणी आहे, पण वीज नाही, वीज आली तर डिझेल नाही, अशी विदारक स्थिती सध्या शेतक-यांची झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विहिरीतील किंवा विंधन विहिरीतील पाणी पिकांना कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतक-यांसमोर निर्माण झाला आहे.
बळिराजा संकटात
कडक उन्हामुळे तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हातात आलेली पिके डोळ्यादेखत करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
















