उदगीर : प्रतिनिधी
गुत्तेदाराने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्या प्रकरणी ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबूराव हुल्ले (वय ५०, रा. वायगाव, ता. उदगीर, ह.मु. लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा आदित्य हुल्ले यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय गुत्तेदार दयानंद हुल्ले यांनी वायगाव येथील राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. दयानंद हुल्ले यांनी काही व्यक्तींना पैसे दिले होते. हे पैसे परत मिळावेत म्हणून त्यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली मात्र पैसे परत न करता संबंधितांनी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती. दयानंद हुल्ले यांनी आत्महत्येपूर्वी त्रास देणा-या व्यक्तींची नावे डायरीत लिहून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणास आता गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ३१ ऑगस्ट रोजी फिर्यादीने पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आसीफ काझी, किरण पायाळ, निखिल जांभळे, लोंढे, घनश्याम मोरे, मीना, विनय जाकते, हरिभाऊ भगत, गणेश हॉटेलचे मालक, केंद्रे इंजिनियर आणि रहिम भाई अशा ११ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















