मुंबईत जनजीवन विस्कळीत, कोकणात नद्यांना पूर
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ब-याच भागांत गेल्या ३ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतही धो-धो पाऊस कोसळत आहे. याशिवाय पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४ ते ६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकणसह या ५ जिल्ह्यातील नागरिकांनी रेट अलर्टच्या या काळात सतर्क राहावे. विशेषत: सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली, पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून उद्या जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात उद्या पावसाचा जोर वाढणार असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे.
कोकणातही मुसळधार
कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत असून, सर्वत्र, नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. त्यातच वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे वाशिष्टी नदीसह इतर नद्या, नाल्यांनाही पूर आला असून, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला.
केडीएमसीमध्ये
शाळांना सुटी जाहीर
ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत कालावधीत ऑरेज होता आता ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. त्यासाठी ४ जुलै रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली.
पुढील ४ दिवसात
राज्यात मुसळधार
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईसह कोकणात आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे. आता ३ ते ७ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
मराठवाड्यात प्रतीक्षाच
मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, प्रकल्पही भरत आहेत. मात्र, मराठवाड्याच्या नशिबी अद्याप प्रतीक्षाच आहे. तुरळक ठिकाणीच रिमझिम सरी कोसळत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.















