जरांगे पाटील आक्रमक, आज आंदोलनाची दिशा ठरविणार
बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने करून मराठा समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले. मात्र सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारची झोप उडविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकले असून अंतरवाली सराटीतून आंदोलनाची शनिवारी घोषणा केली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. कारण कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट आणि आंदोलकांवरील गुन्हे यासारख्या विषयांवरून जरांगे यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
८ महिने उलटून गेले असले तरीही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही, सातारा संस्थानचा जीआर १ महिन्यात काढू म्हटले होते, का नाही काढला, राज्यातील सगळे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, का नाही घेतले, शिवाय शिंदे समितीची मुदत वाढ आणि शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या आंतरवाली सराटीतून जरांगे पाटील काय बोलणार आणि काय त्यांची पुढची भूमिका असणार, याकडे सर्वांचाच लक्ष लागले आहे.
जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मनोज जरांगे यांच्या उद्या होणा-या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात मराठे पुन्हा एकदा मुंबईकडे कुच करणार आहेत. आज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नेकनूरला बळी गेलेला आहे, असे त्यांनी म्हटले. आता उद्या जरांगे पाटील नेमके काय बोलणार आणि मराठ्यांना काय आवाहन करणार, हे पाहावे लागेल.

