लातूर : प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी ‘ओरिगामी, वेस्ट टू वेल्थ आणि वेस्ट टू वंडर’ या विषयांवर एका विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुली व मुले मिळून एकूण ६३ एनसीसी कॅडेटसनी प्लास्टिकला उत्तम पर्याय म्हणून कागदी पिशव्यांची निर्मिती केली आणि त्यांचे सामाजिक वाटप करून एक नवा आदर्श घालून दिला. यावेळी बोलताना कर्नल वाय. बी. सिंग म्हणाले, कच-याचे योग्य व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
कार्यशाळेदरम्यान एनसीसी कॅडेटसनी टाकाऊ कागद आणि वर्तमानपत्रांचा वापर करून अत्यंत मजबूत व आकर्षक पिशव्या तयार केल्या. केवळ पिशव्या बनवून न थांबता, विद्यार्थ्यांनी या पिशव्या स्थानिक भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना मोफत वाटल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा’आणि ‘उत्तम आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळा’, असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे बाजारातील व्यापारी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
कर्नल वाय. बी. सिंग यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी कॅडेटसना मार्गदर्शन करताना सिंग यांनी सांगितले की, एनसीसी कॅडेटसनी कृतीतून दिलेला हा संदेश कौतुकास्पद आहे. साधन व्यक्ती डॉ. कल्याण सावंत म्हणाले की, आजच्या काळात टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ आणि कलात्मक गोष्टी बनवणे ही काळाची गरज आहे.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे हे होते. ते म्हणाले की, शिक्षण केवळ पुस्तकी न राहता ते समाजासाठी उपयोगी पडले पाहिजे, हेच या उपक्रमातून दिसून येते. महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सुभेदार संजय चिकने, सुभेदार संतोष पाटील, हवालदार संतोष शिंदे हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. त्यांनी कॅडेट्सच्या शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे देशाचा सुजाण नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. महेश वावरे, लेफ्ट. डॉ. अर्चना टाक यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. श्रद्धा निकम, वैष्णवी मुक्तापुरे, कॅडेट शुभम मरसुने, कॅडेट जैद सय्यद यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कॅडेट रोहिणी स्वामी हिने सूत्रसंचालन केले तर कॅडेट प्रेरणा लंगर हिने आभार व्यक्त केले.
















