लातूर : प्रतिनिधी
जमिनीची मशागत करून खरीप हंगामासाठी शेतक-यांनी तयारी केली. यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाले असले तरी त्यात सातत्य व समानता नाही. अशातच ज्या परीसरात पेरणी योग्य पाऊस झाला अशा ठिकाणी शेतक-यांनी मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पेरा केला. मात्र यावर्षी १३ कंपण्याचे सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात विक्रीसाठी आल्याची बाब शेतक-यांनी तालुका स्तरावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीतून समोर आले आहे. त्यात सर्वाधिक तक्रारी या महाबिजच्या बियाणांच्या संदर्भाने आहेत. एकतर पाऊसाने ओढ दिल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यावर्षी एल निनोचा प्रभाव खरीप हंगामावर जाणवत आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अल्प पावसामुळे जिल्हयात खरीपाच्या पेरण्यांना वेग आला नाही. जिल्हयात ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी शेतक-यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. तसेच समप्रमाणात पाऊस न झाल्यामुळे त्या परिसरातील शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्हयात आज पर्यंत ११९.४ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. यावर्षी जिल्हयात ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्र असून आज पर्यंत ४१.२३ टक्के म्हणजेच २ लाख ४१ हजार ६२४ खरीपाचा पेरा झाला आहे.
शेतक-यांनी खरीप हंगामात मुग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, सुर्यफूल आदी पिकांचा पेरा केला आहे. तसेच कापसाचीही शेतक-यांनी लागवड केली आहे. १७१ शेतक-यांनी तालुका स्तरावर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार तालुका बियाणे तक्रार निवारण समिती मार्फत तालुका निहाय आलेल्या तक्रारींचे पंचनामे करण्यात येत आहेत. यात १७१ पैकी ८३ तक्रारीचे पंचनामे झाले आहेत. ५५ तक्रारींचे पंचनामे प्रलंबीत आसून ३२ शेतक-यांना तक्रारी नंतर कंपन्यांनी बियाणे बदलून दिले आहे. तर एका शेतक-याने तक्रार माघारी घेतली आहे.
जिल्ह्यात ११९.४ मि. मी. पाऊस
खरीप हंगामातील पेरण्या होण्यासाठी जिल्ह्यात जोरदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ११९.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात २४६.३ मिलीमिटर पाऊस पडला आहे. तसेच रेणापूर तालुक्यात १४१.५ मि.मि., उदगीर तालुक्यात १३७.१ मि.मि., अहमदपूर तालुक्यात १२६.४, लातूर तालुक्यात १२०.६ मि.मि., शिरूर अनंतपाळ तालुक्यात ११८.५, निलंगा तालुक्यात ११४.३ मि.मि., औसा तालुक्यात ९८.७ मि.मि., देवणी तालुक्यात ९१.३ मि.मि., चाकूर तालुक्यात ७७.६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
महाबीज बियाणाच्या सर्वाधिक तक्रारी
ज्या ठिकाणी ब-यापैकी पेरणी योग्य पाऊस झाला तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बियाणेच उगवले नसल्याच्या तक्रारी १७१ शेतक-यांनी केल्या आहेत. यात सर्वाधिक १०२ महाबीजच्या आहेत. तसेच ३१ ऋषिकेश, २२ ओसवॉल, ७ चेतक, बुस्टर, ओडीएसएफ, अंकूर, धनलक्ष्मी, कृषिधन, ग्रीन लिमका, इगल, सनअॅग्री, प्यारी या कंपन्यांचे शेतक-यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नाही. यात कांही कंपन्यांनी आपला विषय वाढू नये म्हणून शेतक-यांना बदली बियाणे देऊन काढता पाय घेतला आहे. सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शेतक-यांचा खताचा, पेरणीचा खर्च वाया गेला. या कंपन्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांमधून होत आहे.
चाकूर तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी
नावाजलेल्या कंपन्यांचे महागडे बियाणे घेऊन शेतक-यांनी पेरणी केली. पण ते बियाणे उगवलेच नसल्याच्या १७१ तक्रारी आल्या आहेत. यात सर्वाधिक चाकूर तालुक्यातून ५० तक्रारी, अहमदपूर ४३, उदगीर व जळकोट प्रत्येकी २३, औसा १०, लातूर व रेणापूर प्रत्येकी ७, निलंगा ५, देवणी २, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातून १ तक्रार तालुका स्तरावर दाखल झाली आहे.
















