नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे आणखी तीन दिवसांनी शुक्रवारी एका नव्या युगात प्रवेश करणार आहे. त्या दिवशी हायड्रोजनवर चालणा-या देशाच्या पहिल्या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील जिंद येथे हिरवा झेंडा दाखवतील. धुराऐवजी पाणी उत्सर्जित करणारी, डिझेलशिवाय आणि ओव्हरहेड वायर्सशिवाय धावणारी ही रेल्वेगाडी ही केवळ एका नव्या गाडीची सुरुवात नाही तर भारतीय रेल्वेने हरित परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामुळे हायड्रोजनवरील रेल्वेगाड्या चालवणा-या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसेल.
हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यानच्या सुमारे ८९ किलोमीटरच्या मार्गावर ती ताशी ७५ किलोमीटर इतक्या कमाल वेगाने धावणारी ही रेल्वे देशाला अधिक स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी वाहतूक प्रणालीकडे नेण्याचा एक प्रयत्न आहे. निळसर रंगाच्या या हायड्रोजन रेल्वेच्या अंतिम चाचण्या दिल्लीतील शकूर बस्ती येथील यार्डात सध्या सुरू आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही हायड्रोजनवर सर्वांत लांब अंतर कापणा-या जगातील रेल्वेगाड्यांपैकी एक असेल.
यात ८ प्रवासी डबे आणि २ पॉवर कार असतील. सुमारे २४०० किलोवॅट क्षमतेसह ही रेल्वे एका वेळी किमान ६८२ प्रवाशांना घेऊन जाऊ शकेल. ही गाडी या मार्गावर दररोज दोन फे-या मारेल आणि एकूण ३५६ किलोमीटर अंतर कापेल. या प्रवासादरम्यान अंदाजे ३०० किलोग्रॅम हायड्रोजन वापरला जाईल. मात्र या प्रयोगासमोर अनेक तांत्रिक आणि पायाभूत आव्हानेही असल्याचे रेल्वेने मान्य केले असून हे तंत्रज्ञान सुरक्षित, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी कसे ठरते, हे सिद्ध करणे हे आव्हान असणार आहे.
पारंपरिक इलेक्ट्रिक रेल्वेगाड्या ओव्हरहेड वायर्समधून येणा-या विद्युत प्रवाहावर अवलंबून असतात. हायड्रोजनवरील या गाडीची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र केले जातात व हीच ऊर्जा रेल्वेगाडीला पुढे नेते. यामुळे होणारे कार्बन उत्सर्जन जवळजवळ शून्य आहे आणि पाणी हे त्याचे मुख्य उपउत्पादन आहे. म्हणूनच स्वच्छ वाहतुकीच्या क्षेत्रात हे एक मोठे यश मानले जात आहे. या रेल्वेगाडीच्या प्रत्येक पॉवर कारमध्ये चार एकात्मिक पॉवर पॅक बसवण्यात आले आहेत. यामध्ये हायड्रोजन फ्युएल सेल आणि लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी यांचा समावेश आहे. प्रत्येक पॉवर पॅक ३०० किलोवॅट ऊर्जा निर्माण करेल, ज्यामध्ये ११५ किलोवॅट फ्युएल सेलमधून आणि १८५ किलोवॅट बॅटरीमधून मिळेल.
बॅटरी ८० टक्के
भरलेली राहणार
दोन पॉवर कार असल्यामुळे या रेल्वेची एकूण क्षमता २,४०० किलोवॅट किंवा अंदाजे ३,२०० हॉर्सपॉवर असेल. गाडी वेग पकडते आणि ऊर्जेची मागणी वाढते, तसतशी त्यातील बॅटरी अतिरिक्त ऊर्जा पुरवते. पण जेव्हा गाडीचा वेग कमी होतो किंवा ती स्टेशनजवळ पोहोचते, तेव्हा अतिरिक्त ऊर्जेने बॅटरी रिचार्ज केली जाते. या व्यवस्थेमुळे संपूर्ण प्रवासात बॅटरी अंदाजे ८० टक्के भरलेली राहते, असेही सांगण्यात येते.
जिंद येथे इंधन
भरण्याचे स्थानक
रेल्वेने जिंद येथे ३,००० किलोग्रॅम क्षमतेचे इंधन भरण्याचे स्थानक उभारले आहे. हायड्रोजन पुरवठ्यासाठी एक विशेष शीतकरण संयंत्र बसवण्यात आले, जे इंधन भरताना हायड्रोजनचे तापमान उणे १५ अंश सेल्सिअसवर राखते. हायड्रोजन उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि खर्च यांच्याशी संबंधित आव्हानांवर यशस्वीपणे मात केली गेली तर हे तंत्रज्ञान येत्या काही वर्षांत डिझेलवर चालणा-या रेल्वे सेवांसाठी एक प्रभावी पर्याय बनू शकते.
















