नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराच्या विविध कथित प्रकरणांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवरील एका विस्तृत पोस्टमध्ये त्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ना खाऊँगा, ना खाने दूँगा या घोषणेचा उल्लेख करत, ती प्रत्यक्षात फोल ठरल्याचा आरोप केला.
रमेश यांनी म्हटले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीला संघटित लूट आणि कायदेशीर दरोडा असे संबोधले होते. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेला २०,००० कोटींचा कथित घोटाळा लपवण्यासाठी जीएसपीसीचे ओएनजीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, इलेक्टोरल बाँड योजना ही पुढे जाऊन ‘चंदा दो, धंदा लो’ असा ४ लाख कोटींचा कथित घोटाळा ठरल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय, उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा झालेला विस्तार हा मोदी सरकारच्या कारभाराचे वास्तव दर्शवतो, असा आरोप करत काँग्रेसने ‘हम अडानी के हैं कौन’ या मोहिमेद्वारे पंतप्रधानांना विचारलेल्या १०० प्रश्नांची आठवण त्यांनी करून दिली.
राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची अद्याप समाधानकारक उत्तरे मिळालेली नसल्याचेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान केअर्स निधी पूर्णपणे अपारदर्शक असून त्यामध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असल्याचा आरोप करत रमेश म्हणाले की, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संस्थेला कमकुवत करण्यात आले. मात्र, तरीही आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील कथित बनावट खर्चांबाबतचे अहवाल समोर आले आहेत. जयराम रमेश यांनी अलीकडील काही घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर आणखी गंभीर आरोप केले. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरीला त्यांनी ‘चंदा चोरी, श्रद्धेचा विश्वासघात’ असे संबोधत हा प्रकार देशाच्या श्रद्धेला धक्का देणारा असल्याचे म्हटले. तसेच, ६ एप्रिल २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कार्यकाळातील काही निर्णयांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पदावर कायम असल्याचा आरोप त्यांनी केला.
















