38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या कूटनीती ने शिंदे सेना चिंतेत !

भाजपच्या कूटनीती ने शिंदे सेना चिंतेत !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना आतापासून विधानसभेची चिंता लागली आहे. भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हेच्या नावाखाली शिवसेनेचे मतदारसंघ स्वत:कडे घेतले जात आहेत. लोकसभेलाच खच्चीकरण होत असले तर विधानसभेच्या निवडणुकीत आपलं काय होणार, अशी भीती आता अनेकांना वाटू लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

लोकसभेच्या काही मतदारसंघांवरून महायुतीमध्ये अजूनही वाद आहेत. नाशिक, कोल्हापूर, हातकणंगले, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांसह आणखी काही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजप आमनेसामने आहेत. काल अमरावतीतून भाजपने नवनीत राणांना तिकिट जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचे समजते.

हातकणंगले आणि कोल्हापुरातही भाजप आग्रही असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाण्यातही भाजपच्या नेत्यांनी जोर लावला आहे. या मतदारसंघात निगेटिव्ह सर्व्हेची चर्चा आहे. त्याचा हवाला देत भाजपकडून शिवसेनेचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे.
भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं कापली जात असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्षपणे स्वत:कडे घेत खच्चीकरण करत असल्याची पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा आहे. भाजपकडून अशी वागणूक मिळत असल्याने शिवसेनेच्या आमदारांना विधानसभेची चिंता वाटू लागल्याची चर्चा आहे.

लोकसभेलाच ही परिस्थिती असेल तर विधानसभेला काय होणार, अशी अस्वस्थता आमदारांमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवणुकीतच त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या कारणांसाठी ठाकरेंची साथ सोडली त्याउलट काही गोष्टी घडत असल्याचेही नेत्यांचे म्हणणे आहे. जागावाटपाच्या चर्चेला केवळ शिंदेंना बोलावले जाते. राष्ट्रवादीतून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असतात. इतर नेत्यांना डावलले जात असल्याची भावनाही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR