मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोप-यात मशाल चिन्ह पोहोचले आहे. आता मतदारांपुढे जातान मशाल चिन्ह घेऊन जा. मशाल हे फक्त चिन्ह नाही, तर यात जुलमी राजवट नष्ट होईल. हुकूमशाही राजवट जळून खाक होईल, असा विश्वास पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१६) व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रचारगीत आज (दि. १६) प्रदर्शित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
मशाल चिन्हावर आमची विजयी सुरुवात झाली आहे. या चिन्हावर अंधेरीत आम्हाला पहिला विजय मिळाला. सरकारविरोधात असंतोष आहे. निवडणूक रोख्यांमुळे भाजपचे बिंग फुटले. स्वातंत्र्यानंतर जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगसोबत संबंध ठेवले होते. आता पंतप्रधान मोदी यांना मुस्लिम लीगसोबतचे जनसंघाचे संबंध आठवले असतील, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
जागावाटपानंतर बंडखोरी आणि गद्दारी होत असेल, तर पक्षाने परिस्थिती हाताळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली.
कर्तृत्व नसल्याने त्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरले आहे, आता माझ्या वडिलांचा फोटो वापरत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. विनोद घोसाळकर ठाकरे सेना सोडून कोठेही जाणार नाहीत.