बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठ्यांच्या एकीची भीती म्हणून महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान हे पाच टप्प्यांमध्ये घेतले.
पाचही टप्प्यांमध्ये सभा घेण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार आहेत. पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये येऊन सभा घ्यावी लागते इथेच मराठ्यांचा विजय झाला आहे. जवळ असलेल्या मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान घेतले जात आहे, ही फक्त मराठा समाजाच्या एकीची भीती आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केला आहे. मग ओपनच्या मतदारसंघांमध्ये ओबीसीच्या नेत्यांचं काय काम आहे? त्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी, असा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
एकीकडे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करायचा आणि दुसरीकडे पुन्हा मतासाठी भीक मागायला यायचं. राज्यात असे १३-१४ मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये ओपनची संख्या जास्त असूनही ओबीसीचे लोक उभा राहिले आहेत. इथे सुद्धा मराठ्यांचा विजय आहे. मराठ्यांनी एक लक्षात ठेवावं. लेकरं आणि समाज डोळ्यासमोर ठेवून अन्याय डोळ्यासमोर ठेवून समोरचा कोणताही उमेदवार असू द्या मराठा आरक्षणाला विरोध करणा-याला सोडू नका, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.