सातारा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असे पाटील यांनी शरद पवारांना कळवले आहे. पवार आज सातारा दौ-यावर आहेत. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणावरून श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती.
श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा देखील प्रस्ताव होता. आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, हा पेच शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचे काम करू अन्यथा शरद पवारांनी इथून उभे राहावे अशी मागणी केली आहे.