नवी दिल्ली : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला तीव्र विरोध करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. भाजप चुकीच्या मार्गाने दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन या विधेयकाला विरोध करतील. जर विद्यमान जागांमध्येच एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले जात असेल तरच काँग्रेस विधेयकाला पाठिंबा देईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस सर्व विरोधी पक्षांच्या संपर्कात असल्याचे रमेश यांनी सांगितले. भाजपकडे लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याची ताकद नाही आणि असे करण्याचा प्रयत्न म्हणजे कलंकित बहुमत ठरेल. लोकसभेत खासदारांची फोडाफोड करूनही सरकारकडे आवश्यक आकडा नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच, चंदा चोरी, पेपर लीक प्रकरण, इथेनॉल घोटाळा, अमेरिकेसोबतचा करार आणि परराष्ट्र धोरण यांसारख्या गंभीर मुद्यांवर ‘इंडिया’ आघाडीसोबत मिळून सरकारला धारेवर धरणार असा इशाराही त्यांनी दिला.
दोन तृतीयांश बहुमताबाबत पसरवल्या जाणा-या अफवांचे खंडन करत, डीएमके आणि आम आदमी पक्षासह सर्व सहयोगी पक्षांशी आम्ही संपर्कात असल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. सरकार दोन तृतीयांश बहुमतापासून अजूनही खूप दूर असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात १० ऑगस्टपर्यंत जेपीसीचा अहवाल येणार असला, तरी ही संकल्पना संविधानविरोधी असल्याने काँग्रेस तत्त्वत: तिचा विरोध करेल, असेही जयराम रमेश म्हणाले. येत्या सोमवारपासून म्हणजेच २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची सोमवारी नियोजित बैठक आहे तर, सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
















