40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेत भाजपाचा पराभव अटळ

लोकसभेत भाजपाचा पराभव अटळ

अमरावती : भाजपाच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केले. २०१९ मध्ये मोदींची हवा असतानाही अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडून आले, मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका, असेच बजावले आहे. नवनीत राणा यांना वस्तुस्थिती समजलेली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र हे समजलेले नाही, ते अजूनही हवेतच आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती आता परिवर्तन रोखू शकत नाही, या शब्दांत काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला.

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू नका’ हे सांगून वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब करत भाजपच्या फुग्यातील हवा काढली आहे, अशी सडकून टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

२००४ मध्ये ‘इंडिया शायनिंग’ आणि ‘फिलगुड’च्या हवेत असलेल्या व अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींच्या सत्तेला सोनियाजी गांधी यांनी सुरुंग लावून सत्तेतून बाहेर कसे केले हे भाजपाला कळले नाही. दरवर्षी २ कोटी नोक-या, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देणार, अशी आश्वासने २०१४ साली मोदींनी दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत, याचा जनतेत प्रचंड राग आहे. सुधीर मुनगंटीवार, अनुज धोत्रे या भाजपा उमेदवारांना जनतेने जाब विचारला. मागील १० वर्षात काय केले असे प्रश्न जनता विचारत आहे, असा दावा अतुल लोंढेंनी केला.

दरम्यान, अनेक गावात भाजपाचे उमेदवार व नेत्यांना हुसकावून दिले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मोदींची गॅरंटी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे. ते जरी पुन्हा आले तरी त्यांचा राजकीय आलेख घसरला आहे, एकनाथ शिंदेंंच्या हाताखाली त्यांना काम करावे लागत आहे. देशात आज भाजपा व मोदी विरोधी हवा आहे. मोदींनी कितीही प्रयत्न केले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोगाचा कितीही गैरवापर केला तरी भाजपाचा पराभव अटळ आहे. काहीही असो भाजपाचे काऊंटडाऊन सुरु झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत या हुकुमशाही सरकार पराभव होऊन जनतेच्या विश्वासाचे नवीन सरकार येण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असे अतुल लोंढे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR