नाशिक : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. मात्र या निवडणूक कालावधीत काही परीक्षांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या निवडणुकीदरम्यान मे महिन्यात सीयूईटी, नीट यांसह सीएच्या विविध स्तरांवरील परीक्षा नियोजित आहे. यापैकी काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून, विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेचे वेध लागले आहेत. अनेक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परीक्षेचे आयोजन केले जात असते. याआधीच जानेवारी सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. आता एप्रिल सत्रात दुस-यांदा ही परीक्षा नियोजित आहे.
मात्र काही परीक्षा या ऐन लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत आल्याने त्यांच्या तारखांमध्ये बदल केले जातील का, अशी चर्चा विद्यार्थी, पालकांकडून सुरू झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (यूजी) २०२४ ही परीक्षा ५ मेस घेण्याचे नियोजित असून, या तारखेत बदल होण्याची शक्यता तुरळक आहे.
तर सनदी लेखापाल (सीए) या अभ्यासक्रमासाठी मे-जून सत्रातील परीक्षांच्या तारखांची घोषणा व्हायची आहे. त्यामुळे निवडणूक मतदानाच्या तारखा वगळून याच महिन्यात परीक्षा घेत आयोजन संस्था वेळापत्रक पाळणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
‘एनटीए’तर्फे सीयूईटी-यूजी परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते ३१ मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार असून, या कालावधीत २० व २५ मे या दोन तारखांच्या दिवशी देशात काही राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे.
महाराष्ट्रातही या तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान परीक्षेकरिता नोंदणीची मुदत २६ मार्चपर्यंत असून, दाखल अर्जातील विद्यार्थ्यांच्या भौगोलिक स्थिती व निवडणुकांच्या तारखा यांचा अंदाज घेत आवश्यकता भासल्यास परीक्षा तारखेत बदल केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एमएचटी-सीईटीतही बदल
राष्ट्रीय पातळीप्रमाणे राज्यस्तरावरील काही प्रवेश परीक्षा निवडणूक कालावधीत प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी-सीईटी या परीक्षेचा समावेश आहे. ही परीक्षा १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होत आहे.
या दरम्यान राज्यातील नागपूर, रामटेक, नंदुरबार, धुळे, रावेरसह एकूण ११ मतदारसंघात १९ व २६ एप्रिल या दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील विद्यार्थ्यांना संबंधित दिवशी केंद्रावर पोचणे अडचणीचे ठरणार असून, सीईटी सेलला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.