नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची दखल घेत भाजपने प्रचाराच्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांवर भर देत प्रचार अधिक धारदार व प्रभावी केला जात आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५ ते १०% मतदान वाढविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात ६३ टक्क्यांहून कमी मतदान झाल्याने गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व राज्यांतील परिस्थितींचा आढावा घेण्यात आला.
भाजपला हवे ६६ टक्के मतदान
२०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला, तेव्हा ६६ टक्के मतदान झाले होते आणि भाजपने २८४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजप दुस-यांदा सत्तेत परतला तेव्हा ६७.४० टक्के मतदान झाले आणि भाजपने ३०३ जागा जिंकल्या. म्हणजे किमान ६६ टक्के मतदान झाल्यास, भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असा कयास आहे. पहिल्या फेरीत केवळ ६३ टक्के मतदान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतेत आहेत. जनतेला मतदानासाठी प्रवृत्त करण्यास कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.