40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला...!

अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला…!

मुंबई : उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पुत्र, पुत्री प्रेमामुळे त्यांचे पक्ष फुटले, या भाजपा नेते अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देताना, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप हरला, असा टोला हाणला.

पनवेल महापालिकेतील भाजपाच्या ४ माजी नगरसेवकांनी तसेच मनसेच्या काही पदाधिका-यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल भंडारा येथे केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले. भंडारा प्रचारसभेत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपने आमचा पक्ष फोडला असा आरोप करत असतात. त्यांचे पक्ष भाजपने फोडले नाहीत. तर उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले, असा टोला अमित शाह यांनी लगावला होता.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हरला आहे. मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागला. अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामना मुंबई ऐवजी गुजरातमधील अहमदाबादला हलवला व त्यामुळे भारताचा पराभव झाल्याची टीका त्यावेळी झाली होती.

अमित शाह सांगतात की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस सांगतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शाह आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. त्यांचे चेलेचपाटे अमित शाह यांची लाज काढत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR