लातुर : प्रतिनिधी
भाजप सरकारने दहा वर्षात काय काम केले हे सांगावे, सध्या भलत्याच मुद्द्यावर निवडणूक लढवायची, राजकीय पोळी भाजायची हम करे सो कायदा करायचा, मग ढुंकूनही समाजाकडे पाहायचे नाही, अशी सत्ताधा-याची जुलमी राजवट राज्यात व देशात चालू आहे. केंद्रातील भाजपाची सत्ता जनता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी शहरातील ंिरग रोडवरील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे नाभिक समाज जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास पवार, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष अजित ंिनंबाळकर, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, एकनाथ पाटील, व्हाईस चेअरमन समद पटेल, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, हरिभाऊ गायकवाड, जगन्नाथ गवळी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी संत सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, नाभिक समाज नेहमीच काँग्रेस पक्षाच्या समवेत राहिला आहे. काँग्रेसचे व नाभिक समाजाचे अतूट नाते आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि मला व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत.
नाभिक समाजाला हा व्यवसाय आता परवडत नाही. महागाई वाढली आहे, उत्पन्न कमी झाले आहे. मग घर कस चालवावे हा प्रश्न त्यांना पडत आहे. नाभिक समाज जो व्यवसाय करतो त्याच्या शुल्कात वाढ झाली पाहिजे, महायुतीच्या काळात भ्रष्टाचार फोफावला आहे, महाविकास आघाडीच्या काळात असे नव्हते. महायुतीने पक्ष फोडले, घर सुद्धा फोडले या निवडणुकीत मतदारांना भाजपने आपण दहा वर्षात काय केले हे सांगावे.
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचीही भाषणे केली. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे यांनी सूत्रसंचालन मनोज वाघमारे यांनी केले तर शेवटी आभार अजित ंिनंबाळकर यांनी मानले.