मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली गेली. या सीरिजमधील शेवटचा सामना हा धर्मशाला स्टेडियमवर पार पडला असून आज या सामन्याचा तिसरा दिवस होता. सामन्याच्या तिस-या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडवर एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला आहे.
यासह टीम इंडियाने सीरिजमध्ये ४-१ अशी आघाडी घेऊन टेस्ट सीरिज जिंकली.
धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ४७७ धावा केल्या तसेच २५९ धावांची आघाडी घेतली. भारताची ही आघाडी मोडण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले परंतु ते भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाहीत. इंग्लंडकडून सर्वाधिक ८४ धावा जो रूट याने केल्या, परंतु रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही.
भारताकडून १०० वी टेस्ट खेळणारा गोलंदाज आर. अश्विन याने तिस-या दिवशी इंग्लंडच्या तब्बल ५ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २ विकेट्स घेण्यात यश आले. तसेच रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. तिस-या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांना इंग्लंडला १९५धावांवर रोखण्यात यश आले. त्यामुळे भारताचा पाचव्या टेस्ट मॅचमध्ये एक डाव आणि ६४ धावांनी विजय झाला.
टीम इंडियाने सीरिजमधील ५ पैकी ४ सामने जिंकल्याने विजयी आघाडी मिळवत टेस्ट सीरिज जिंकली आहे. टीम इंडियाने हैदराबाद येथे सीरिजमधील पहिला सामना वगळता विशाखापट्टणम, राजकोट, रांची, धर्मशाला असे चारही सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला केवळ हैदराबाद येथे झालेला पहिला सामना जिंकण्यात यश आले होते.