नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात यंदा होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आयपीएलच्या आगामी हंगामाचा दुसरा टप्पा हा यूएईत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून संपूर्ण आयपीएलचा हंगाम हा भारतातच खेळवला जाणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
‘यंदाच्या आयपीएलचा संपूर्ण हंगाम हा भारतामध्येच खेळवला जाईल. उर्वरित हंगामाच्या वेळापत्रकावर आम्ही काम करत असून लवकरच ते जाहीर केले जाईल’, असे सचिव जय शहा यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. एकूण सात टप्प्यांत होणा-या या निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलला सुरू होणार असून २० मे रोजी शेवटचा टप्पा पार पडेल. पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने याआधीच जाहीर केले आहे.
याआधीही २०१९ च्या निवडणुकांवेळी आयपीएलचा संपूर्ण हंगाम हा भारतात आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या हंगामाचे २२ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. गतविजेते चेन्नई आणि आरसीबी यांच्यात यंदाच्या हंगामाचा सलामीचा सामना रंगणार आहे.