28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीचे जागावाटप गुरूवारी जाहीर होणार

महायुतीचे जागावाटप गुरूवारी जाहीर होणार

अजित पवार यांची माहिती रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीतील जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाले आहे. जागावाटपाबाबत महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. येत्या २८ मार्चला मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. उमेदवार बदलण्याच्या केवळ अफवा असून तुमच्या मनात जो आहे तो उमेदवारच तिथे देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच सुनेत्रा पवार यांनाच बारामतीतून उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.

५ वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्या वेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. आम्ही नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते तर एमआयएमची १ जागा अशा निवडून आल्या होत्या मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त ३ जागा लढवणार, अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्र पक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक-एक लोकसभा आणि आमदारांवर एक-एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे, असेही ठरल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत, अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धार करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्याबद्दल विचारले असता, शिवतारेंबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीत तुमच्या मनातीलच उमेदवार
कारण नसताना राष्ट्रवादीला केवळ तीन ते चारच जागा मिळणार, अशा बातम्या चालविल्या गेल्या; पण आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याचे स्पष्ट करतानाच बारामतीमध्ये तुमच्या मनात आहे तोच उमेदवार मिळणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. २८ तारखेला उमेदवारांची नावे कळतील, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR