मुंबई : काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेस श्रेष्ठींशी बोलण्यासाठी नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले.
अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसमधून बाहेर पडल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. नाना पटोले यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे’ असे त्यांनी लिहीले आहे.
कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू’असेही नाना पटोले म्हणाले.