चाकूर : प्रतिनिधी
आष्टामोड ते उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील नळेगावजवळील तसेच टोल नाका परिसरातील धोकादायक वळणांच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या दोन्ही ठिकाणी असलेल्या तीव्र वळणांमुळे गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून, अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने सुधारणा करण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या कामाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. डीपीआर पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष सुधारणा कामाला गती मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. तसेच या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे अमोल पाटील कौळखेकर यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. या सुधारणेमुळे आष्टामोड-उदगीर मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून, अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
















