नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षांपासून कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांवर नजर टाकली तर भारत दुस-या क्रमांकावर येतो, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. या देशांमध्ये लोकसंख्याही जास्त आहे. ज्यामुळे कर्करोगाचे रुग्णही जास्त आढळतात.
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ग्लोबोकॅनच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, भारतात कर्करोगाचे सुमारे १४ लाख रुग्ण आढळले आहेत. तर, ९ लाखांहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. जावा नेटवर्कचा एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये असे म्हटले की, भारतातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के लोकांना या प्राणघातक आजाराचा सामना करावा लागतो. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम इन्व्हेस्टिगेटर ग्रुपने हे संशोधन केले आहे.
या अभ्यासात, ७ लाखांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यासोबतच, २ लाख प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाले. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, कर्करोग आता फक्त एक समस्या राहिलेली नाही, तर ती एक मोठे आव्हान बनले आहे.
मिझोरमची राजधानी ऐझवाल कर्करोगाच्या बाबतीत सर्वात जास्त प्रभावित आहे. येथे कर्करोगाच्या सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. येथे, दर १ लाख पुरुषांपैकी २५६ पुरुषांना कर्करोग असल्याचे आढळून आले, तर दर १ लाख महिलांपैकी २१७ जणांना कर्करोग असल्याचे आढळून आले.
ईशान्य भारतातील ६ जिल्हे सर्वात गंभीर आहेत, जिथे कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे आढळून येत आहेत. याशिवाय, काश्मीर खोरे आणि केरळमध्ये देखील कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून आले. हैदराबादमध्ये, दर १ लाख महिलांपैकी १५४ महिला कर्करोगाच्या रुग्ण असल्याचे आढळून आल्या.
स्तनाच्या, तोंडाच्या कर्करोगाचे अधिक प्रकरण
देशाच्या ईशान्य भागात दोन प्रकारच्या कर्करोगाचे प्रकरण वाढत आहेत. पहिला म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग. दुसरा म्हणजे पोटात होणारा कर्करोग. मोठ्या शहरांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाणही जास्त आढळत आहे. गावांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग सर्वाधिक आढळून आला.
















