मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र हा उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमान वाढल्यामुळे बाजारपेठ तसेच रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणामधील चार जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंचिर्याल, आदिलाबाद, निर्मल, भोपालपल्ली या चार जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगावात ४३ अंश सेल्सिअस तापमान
जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, चाळीसगावातील तापमानाने यावर्षी दुस-यांदा उच्चांक गाठत तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह शेतकरी, मजूर आणि वाहनचालकांनाही बसत आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने देखील येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
अकोल्यात ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अकोल्यात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून, नागरिक डोक्यावर रुमाल, हातात छत्री घेऊनच बाहेर पडताना दिसत आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
वर्ध्यात पारा ४६ अंश सेल्सिअसवर
वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवस तब्बल ४६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भाचे जिल्हानिहाय तापमान
अकोला : ४६.३ अंश सेल्सिअस, अमरावती – ४६.४, वर्धा- ४६.५, नागपूर- ४४.४, बुलडाणा- ४३.६, चंद्रपूर-४३.८, गोंदिया- ४३.८, गडचिरोली- ४३.६, यवतमाळ -४५.४ आणि वाशिममध्ये ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
















