नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात उष्णतेची विक्रमी तीव्र लाट पसरली आहे. त्यातच आता स्कायमेट या हवामान संस्थेने अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार झाल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत होऊ शकते. यातून केरळसह दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा धोका आहे. पुढील आठवडाभर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातसह १० राज्यांमध्ये कोरडे, उष्ण वारे वाहू शकतात. त्यामुळे मान्सून वारे कमकुवत राहण्याचा धोका आहे, असा अंदाज वर्तवला आहे.
या काळात याच राज्यांमध्ये कमाल तापमान ४५ अंश किंवा त्याहून अधिक प्रमाणात वाढू शकते. पश्चिमी प्रणाली कमकुवत झाल्याने आणि कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नसल्यामुळे पावसाची शक्यता नाही. काल देशभरातील जवळपास २२ शहरांत ४५ अंश सेल्सिअसवर तापमान होते. तसेच उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यांमध्ये ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
दिल्लीत मंगळवारी या वर्षातील उष्णतेच्या लाटेचा चौथा दिवस नोंदवला गेला. सफदरजंग येथे कमाल तापमान ४५.१ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते तर रिज परिसरात ४६.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. पंजाबमधील फरिदकोट येथे तापमान ४७.३ अंशांवर पोहोचले. हरियाणातील रोहतक येथेही ४७ अंशांच्या जवळपास, नारनौल येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब-याच राज्यांत पुढील काळातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनचा दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश
भारतात मुसळधार पाऊस पाडणा-या नैऋत्य मान्सूनने मंगळवारी कोमोरिन समुद्र, श्रीलंका आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातील काही इतर भाग व्यापले. त्याने दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. येत्या २-३ दिवसांत तो लक्षद्वीप बेटांमधील मिनिकॉय बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, पुढे मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.
















