34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशासकीय कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुटी

शासकीय कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुटी

राज्य सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एकूण ७ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे २०२४ अशा पाच टप्प्यांत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात येणार आहे.

ही सुटी उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचा-यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील असे राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR