मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना मुंबई नॉर्थ वेस्टकडून उमेदवारी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
अमोल कीर्तिकर यांना बुधवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर आधीच अडचणीत सापडले आहेत, त्यांचे पाय आणखी खोलात जाणार का अशी चर्चा असतानाच ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे.
एकडीकडे उद्धव ठाकरे आणि गटातील नेते हे भाजपवर जहरी टीका करतात आणि दुसरीकडे खिचडी घोटाळा प्रकरणी इडीचे समन्स दिलेल्या नेत्यालाच उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बुधवारी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. मुंबईतील लोकसभेच्या ६ पैकी ४ जागांवर उमेदवार दिले आहेत.
त्यामुळे काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. ज्या जागांवर काँग्रेस नाराज आहे त्यापैकी एक म्हणजे उत्तर-पश्चिम मुंबई. येथे उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना तिकिट दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना येथे निवडणूक लढवायची होती. राहुल गांधींनीही तसे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता कीर्तिकरांना अर्ज भरता येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.