अलिबाग – शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (२९ मार्च) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.
शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मीनाक्षी पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यादेखील त्या दीर्घकाळ अध्यक्षा होत्या. त्यांच्या निधनाने रायगडात शोककळा पसरली आहे. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे.