मोतिहारी : बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बिहारच्या मोतिहारीमध्ये एक महिला आणि ३ मुलींसह ४ जणांची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीने तीन मुली आणि पत्नीची कु-हाडीने गळा कापून हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती फरार आहे. त्यामुळे या घटनेमागे पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
गुरुवारी रात्री घरात काही कारणावरून वाद झाल्याचे बोलले जात आहे. या वादाचा पतीला राग आला. यामुळेच त्याने हत्याकांड घडविल्याचे बोलले जात आहे. रात्री पत्नी आणि मुली झोपेत असताना आरोपीने त्यांची हत्या केली. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा वाद कशामुळे झाला आणि कशाची चर्चा झाली, हे ही समजू शकले नाही. मोतिहारीच्या पहारपूर पोलिस स्टेशन हद्दीतील बावरिया गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच डीएसपी रंजन कुमार यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे पोलिस गावात पोहोचले आहेत.
एकाच कुटुंबातील ४ जणांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.