अमेरिकेसोबतचा करार शेतक-यांसाठी मारक, राहुल गांधींचे टीकास्त्र
गुन्हा दाखल करा, हक्कभंग
आणा, मागे हटणार नाही
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सलग दुस-या दिवशी हल्लाबोल केला. लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी यांनी आक्रमकपणे बोलत शेतकरी देशाचा पाया असल्याचे म्हटले. त्यानंतर आज त्यांनी एक व्हीडिओ प्रसारित केला. त्यात माझ्यावर एफआयआर असो, गुन्हा दाखल होऊद्या किंवा हक्कभंग प्रस्ताव आणूद्या. मी शेतक-यांसाठी लढणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
भारताने अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला, तो शेतक-यांची रोजी रोटी हिसकावून घेईल. देशाच्या अन्न सुरक्षेला कमजोर करेल. हा करार शेतकरीविरोधी आहे. अन्नदात्याच्या हित लक्षात घेता शेतकरीविरोधी मोदी सरकारला समझोता करू देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्न सुरक्षा आणि शेतक-यांना धोका दिला. अमेरिकेसोबत करार करून कापूस, सोयाबीन, सफरचंद आणि फळ उत्पादक शेतक-यांना विकले आहे. भारताच्या कृषी बाजारावर वर्षांपासून विदेशातील लोक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी दरवाजा उघडला आहे. दरवाजा का उघडला तर त्यांच्या गळ््याला चोक लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांची लगाम पकडली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
तुम्ही माझ्यावर केस करा, शिवी द्या, जे करायचे आहे ते करा, विशेषाधिकार भंग आणायचा असल्यास आणा, काही फरक पडत नाही. संसद भवनात सत्य बोललो आहे. तुम्हाला सत्य चांगले वाटत नसेल तर वेगळा भाग आहे. देश सत्य समजतो, तुम्हाला काही करायचे असेल ते करा. मी शेतक-यांसोबत उभा आहे. एक इंच मागे हटणार नाही. काँग्रेस अध्यक्ष खर्गेजी, काँग्रेस पार्टी आणि कार्यकर्ते शेतक-यांसोबत आहोत. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदी शेतकरीविरोधी
मका, कापूस सोयाबीन आणि फळे ही सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण कृषी मार्केटचे दरवाजे आपल्या मित्रांसाठी, विदेशी शक्तींसाठी उघडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. पहिल्यांदा त्यांनी काळे कायदे आणले होते. आता त्यांनी विदेशी शक्तींसाठी दरवाजे उघडले.
अमेरिका, भारतीय
शेती, सवलतीत फरक
अमेरिकेमधील शेतक-यांची शेती मोठी असते. तेथे हजारो एकरची शेती असते, यांत्रिकीकरण झालेले आहे. सरकार त्यांना अनुदान देते. आपल्या शेतक-यांची शेतजमीन लहान आहे. योग्य एमएसपी मिळत नाहीत, यांत्रिकीकरणाचे नाव नाही. नरेंद्र मोदीजी यांनी देशाला विकले, शेतक-यांना विकले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

