नवी दिल्ली : ३१ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाची इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षासह महा रॅली होणार आहे. सर्व विरोधक एका व्यासपीठावर एकत्र येऊन आपली ताकद दाखवतील आणि ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ चा नारा देणार आहेत. या महारॅलीची जोरदार तयारी सुरू आहे.
इंडिया आघाडीचा लढा हा संपूर्ण देशाचा लढा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून केंद्र सरकारने विरोधकांना संपविण्याचा डाव रचला आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील लोकांमध्ये राग आहे. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन ‘आप’चा लढा किती महत्त्वाचा आहे हे सांगत आहेत. यामुळे ‘आप’च्या संबंधित जुन्या नेत्यांमध्येही नवा उत्साह आहे. या महा रॅलीत शेतकरी, मजूर संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान, रॅलीला परवानगी मिळेल की नाही याची भीती होती, मात्र पोलिसांशी ‘आप’ची चर्चा झाली आहे. निवडणूक आयोगालाही या महारॅलीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे, असे ‘आप’च्या नेत्याने सांगितले.
दरम्यान रामलीला मैदानात होणा-या महारॅलीत २० हजार लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. या रॅलीत इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंपाई सोरेन, भगवंत मान, डेरेक ओब्रॉय, द्रमुक, फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह ‘आप’चे नेते सहभागी होणार आहेत. हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणा या रॅलीतून देण्यात येणार आहे.