पंढरपूर : सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. पंढरपूरच्या बंधाऱ्यात फक्त पावणेदोन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या बंधाऱ्यातून पंढरपूर, कासेगाव व सांगोला पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवले जाते. यामुळे आगामी काळात बंधाऱ्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. यामुळे शहराला पुढील काही दिवसांनंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
सांगोला व पंढरपूर शहरासह ८० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातदेखील पाणीसाठा होता. या बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता तीन मीटर आहे; परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे व उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. सध्या बंधाऱ्यामध्ये दीड मीटर (१.८० मी.) पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा रोज पाणीपुरवठा केल्यास फक्त २० मेपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. जादा दिवस पाणी पुरवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
सोलापूर महानगरपालिकेने शहराला पिण्यासाठी पाणी सोडावे, असे निवेदन भीमा पाटबंधारे विभागाला दिले आहे. उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. जादा दिवस पिण्याचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी काही दिवसांनी दोन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणातून पुन्हा पाणी न सोडल्याने बंधाऱ्यातील पाणीपातळी पूर्ण कमी होणार आहे.बंधा-यातील पाणीसाठा लक्षात घेता पाणीपुरवठा करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने पाणी कपातीचे धोरण आखले आहे. जानेवारीपासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचे दोन भाग करून पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.