38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्र‘४०० पार’ची स्वप्ने पाहणा-यांनी तरुणांची स्वप्ने चिरडली

‘४०० पार’ची स्वप्ने पाहणा-यांनी तरुणांची स्वप्ने चिरडली

मुंबई : प्रतिनिधी
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (एनसीपी- एसपी) मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के युवक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ‘चारसौ पार’ची स्वप्ने पाहणा-यांनी तरुणांची स्वप्ने पार चिरडून टाकली असल्याची टीका एनसीपी-एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने दिलेल्या अहवालानुसार देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के युवक आहेत. त्यातही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. २००० सालच्या तुलनेत २०२२ साली सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढून ६५.७ टक्के झाली आहे. हा रिपोर्ट जितका धक्कादायक आहे तितकाच दुर्दैवी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सध्या सर्व बाबींची गॅरंटी घेणारे केंद्र सरकार, देशातील तरुणांना दशकभरापूर्वी दिलेली रोजगाराची गॅरंटी पूर्ण करू शकले नाही, हे यातून स्पष्ट होते. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ या योजनांच्या नावाखाली केंद्र सरकारने फक्त स्वत:चे मार्केटिंग केले, स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोटी-कोटी रुपयांच्या घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात सरकार देशातील तरुणांच्या कौशल्याचा विकास करू शकले नाही हेच या आकड्यांमधून स्पष्ट होते, असे शरसंधान त्यांनी केले आहे.

राज्याचीच परिस्थिती बघितली तर लक्षात येईल की, हे सरकार किती पाण्यात आहे. शासकीय पदांसाठीच्या भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. परीक्षांमध्ये सर्रास घोटाळे होत आहेत. वेदांता, फॉक्सकॉन यासारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर आंदण म्हणून दिले जात आहेत. तरुणांच्या बेरोजगारीशी संलग्न असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत आहेत. तरुणांचे बिघडणारे मानसिक स्वास्थ्य, त्यामुळे वाढत असलेली गुन्हेगारी या समस्या तर दुर्लक्षितच आहेत. ‘चारसौ पार’ची स्वप्ने पाहणा-यांनी तरुणांची स्वप्ने पार चिरडून टाकली आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR