34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणात ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान

तेलंगणात ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान

हैदराबाद : तेलंगणामध्ये गुरुवारी मतदान झाल्यानंतर एकूण २२९० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी मतदानाची मुदत संध्याकाळी ५ वाजता संपली. यानंतर रांगेत उभे असलेल्या मतदारांनाच मतदान मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. येथील विधानसभेच्या ११९ जागांपैकी १९ अनुसूचित जाती आणि १२ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

तसेच बीआरएस नेत्या के कविता यांच्यावर मतदान केंद्रात मीडियाशी बोलल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदानादरम्यान तीन ते चार ठिकाणी बीआरएस- काँग्रेस आणि भाजप-बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला.

निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून बीआरएस उमेदवारांविरोधात निवडणूक प्रक्रियेच्या उल्लंघनाची तक्रार केली आहे. किशन रेड्डी यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

हल्ला करण्याचा प्रयत्न
तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे भाऊ कोंडल रेड्डी यांनी आरोप केला की, जेंव्हा ते एका बूथवर गेले तेंव्हा बीआरएस कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले. बीआरएस कार्यकर्त्यांची वाहने माझ्या गाडीच्या मागे लागली असून मला अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे ते म्हणाले.

दोन जणांचा मृत्यू
आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या टोकला गंगाम्मा (७८) आणि राजन्ना (६५) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला. मतदानादरम्यान रांगेत उभ्या असलेल्या टोकला गंगाम्मा यांना हृदयविकाराचा धक्का बसला तर रांगेत उभ्या असलेल्या राजण्णा यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR