मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोठ्या घडामोडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली असून, या भेटीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अचानक दिल्लीला बोलावण्यात आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार का, किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांबाबत त्यांच्याशी चर्चा होणार का, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिल्लीला बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणे, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्र-राज्य समन्वयाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. आता केंद्रातील संभाव्य फेरबदलामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते दुपारी सोलापूरहून विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकी कोणती राजकीय रणनीती आखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नीट परीक्षा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे बंधूंनी रविवारी मुंबईत तिरंगा मार्चची हाक दिली असून, या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील वाढत्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्ली भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्र सरकारमधील संभाव्य फेरबदल, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार, तसेच आगामी राजकीय रणनीती या सर्व मुद्द्यांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीनंतरच या सर्व घडामोडींवरील अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी दिल्लीतील या हालचालींमुळे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
















