नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जारी केलेले संकल्प पत्र हे खोट्या आश्वासनांचे (जुमला) पत्र असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द भाजपच्या जाहीरनाम्यातून आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून गायब असल्याचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीची योजना पूर्णपणे स्पष्ट आहे. ३० लाख पदांवर भरती आणि प्रत्येक शिक्षित युवकाला एक लाख रुपये पगाराची पक्की नोकरी, युवावर्ग यावेळी मोदींच्या आश्वासनाला फसणार नाही तर काँग्रेसचा हात मजबूत करून देशात रोजगार क्रांती आणणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
तर कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपचे संकल्प पत्र हा देखावा असून त्यांचा खरा संकल्प संविधान बदलण्याचा आहे. देश, समाज आणि लोकशाही विरोधी सर्व कट भाजप आधी तळातून सुरु करते. सुरुवातीला त्यांचे नेते जनतेसमोर संविधानाची शपथ घेतात आणि रात्री रात्री संविधान संपविण्याची पटकथा लिहिली जाते. सत्ता प्राप्तीनंतर संविधानावर हल्ला केला जातो. भाजपची संविधान बदलाची मोहीम सर्वांनी एकजूट होऊन हाणून पाडण्याची वेळ आली आहे.
समाजाच्या सर्व घटकांच्या हिताचे काम करण्यात पंतप्रधान मोदी यांना अपयश आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही, अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तर भाजपच्या संकल्प पत्राला कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी माफी पत्राची उपमा दिली. दलित, शेतकरी, युवक आणि आदिवासींची पंतप्रधानानी माफी मागावी, असेही खेडा म्हणाले.