मुंबई : प्रतिनिधी
भाजपा कितीही चारशे पार जाण्याच्या वल्गना करत असली तरी देशातील एकूण राजकीय स्थिती पाहता भाजपा दोनशेच्या पुढेही जाऊ शकणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी टीका त्यांनी केली. ऑक्टोबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर प्रखर टीका केली. २०१४पासून आतापर्यंत १७ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे असे सरकार स्वत:च सांगत आहे. देशातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. नवीन सर्व्हेनुसार भाजप दोनशेच्या आकडा पार करू शकत नाही हे समोर आले आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.