30.8 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरछ. संभाजीनगरात कुणाला फायदा आणि कुणाला फटका?

छ. संभाजीनगरात कुणाला फायदा आणि कुणाला फटका?

मराठा मतदारांवर भिस्त उमेदवार लागले कामाला

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. महाविकास आघाडीकडून शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव हे प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत.

पण, लढत महायुती, महाविकासआघाडी आणि एमआयएम अशी तिरंगीच असणार आहे. सगळ्यांची भिस्त मतांच्या फाटाफुटीवर असणार आहे. त्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार, शिवाय मराठा फॅक्टर कुणाच्या बाजूने जातो यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना चार हजार ४९२ मतांनी निसटता विजय मिळविला होता. यावेळी एमआयएम आणि वंचित स्वबळावर लढत आहेत. दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीतही फूट पडली आहे.

याचा परिणाम त्यांच्या संघटनेसह मतदारांवरही होणार आहे. तीनही पक्षांच्या उमेदवारांवर नजर टाकली, तर चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वी चारवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. महायुतीचे भुमरे हे विधानसभेच्या पैठण मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. सध्या ते राज्याच्या मंत्रिमंडळात रोहयो मंत्री आहेत. एमआयएमचे इम्तियाज यांनी पाच वर्षांत खासदार म्हणून आपल्या कामाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे तीनही उमेदवार तगडे आहेत. मतांची फाटाफूट झाल्यास लढत अटीतटीची होईल. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारीच्या रूपात निष्ठेचे फळ मिळाले. ते सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत. दोनवेळा आमदार, चारवेळा खासदार, राज्यात युतीची सत्ता असताना विविध खात्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खैरे यांनी काम केलेले आहे. त्यांना राज्याच्या आणि दिल्लीतील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. लोकसभेला गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला, ही त्यांच्यासाठी बलस्थाने ठरू शकतात. आपल्याला सहानुभूती मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

ही जागा कोण लढविणार यावरूनच महायुतीत भाजप व शिंदे गटात रस्सीखेच होती. भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी गेली वर्षभरापासून तयारीही केली होती. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) ही जागा प्राप्त करून घेण्यासाठी बरीच शक्ती पणाला लावावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी, एमआयएम प्रचारात पुढे निघून गेल्यानंतर अगदी प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना भुमरे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. राज्यात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आणि त्याचा फायदा मतांच्या रूपात करून घेण्यासाठी शिंदे यांनी आवर्जून भुमरे यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिला.

एमआयएमला फटका बसणार?
राज्यात असलेल्या सत्तेचा आणि महायुतीतील घटक पक्ष भाजप व राष्ट्रवादीची त्यांना किती प्रामाणिक मदत होते, यावरच भुमरे यांचा विजय अवलंबून असणार आहे. जागा न सुटल्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. ही नाराजी बाहेर पडली, तर भुमरेंची अडचण होणार आहे. मतदारसंघाचा विचार केला तर जलील यांनी इतर समाजातील मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. आदर्श सहकारी नागरी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी त्यांची सहानुभूती मिळविली. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय एमआयएमला सर्वाधिक फटका बसू शकतो, तो वंचित सोबत नसल्याचा.

जाधवही मैदानात
इम्तियाज यांच्या विजयात वंचितचा सिंहाचा वाटा होता. आता वंचितने अफसर खान यांना उमेदवारी घोषित केली आहे. मात्र, बुधवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल करू, अशी घोषणा खान यांनी केली. मागील वेळेस लक्षणीय मते घेणारे हर्षवर्धन जाधव मैदानात आहेत. मात्र, त्यांना प्रभाव दिसत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR