औसा : प्रतिनिधी
येणा-या लोकसभा निवडणुकीत धाराशिवचा खासदार व औशाचा आमदार शिवसेनेचाच हवा, यासाठी सर्वानी सज्ज राहावे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
औसा येथे (दि. ७) जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुषमा अंधारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दिनकर माने, आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, अमर खानापुरे, राष्ट्रवादीचे सुभाष पवार, लिंंबन महाराज रेशमे, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, महिला जिल्हा संघटक जयश्री उटगे हे उपस्थित होते
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे पण मोदींची एकाधिकारशाही सुरू असून ही एकाधिकारशाही गाढून टाकायची आहे. मोदी कोणाला माहित नव्हते, तेव्हापासून धाराशिव लोकसभा शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. ती आता यापुढेही राहील. मोदींचा शिक्का आता चालणार नाही. गृहमंत्री अमित शाहांची हिंमत मणिपूर किंवा काश्मीरला जायची नाही, ते येथे मराठवाड्यात येऊन आपला फणा काढत आहेत असे सांगून मी जनतेच्या न्यायालयात जात आहे. जनता तुम्हाला योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
औसा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, रुग्णालयाचा प्रश्न आहे, गुत्तेदारी वाढली आहे तर अप्रोच रोड, चौकात उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. मग या आमदारांनी केले काय, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. खा. ओमराजे निंबाळकर यांनी मागच्यावेळी मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून १ लाख २७ हजार मताच्या मताधिक्ययाने विजयी झालो. त्यापेक्षा एक तरी अधिक मत घेवून मी विजयी होईन, असा विश्वास व्यक्त केला.
आता औशाची जागाही आपल्याला जिंकायचीय
देवेंद्र फडणवीस माझ्याकडे गयावया करीत आले आणि त्यांचा पीए अभिमन्यू पवार यांच्यासाठी औशाची जागा सोडली. मात्र, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. जिंकणारी जागा मी प्रेमाने सोडली, पण आता ती पाडा. केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेतही औशाच्या जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी गर्जना ठाकरे यांनी केली.
फडणवीस चोरांचे सरदार
खा. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना ते चोरांचे सरदार आहेत. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात ज्या पध्दतीने राजकारण झाले ते चुकीचे आहे. आपल्या मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसले जात आहेत. त्याचा बदला घ्यायचा आहे. या चोरांच्या सरदारला जेलमध्ये टाकायचे आहे. मोदी म्हणजे विश्वासघात आहे. गॅरंटी वैगरे काही नाही, असा आरोप करीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले.