40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडागुजरातने मुंबईच्या तोंडचा घास पळवला

गुजरातने मुंबईच्या तोंडचा घास पळवला

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबईचा विद्यमान कर्णधार आहे, तर शुबमन गिल प्रथमच कर्णधापद सांभाळत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. यजमान गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी करून १६९ धावांचे आव्हान दिले होते.

१६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा फटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले. पण डेव्हाल्ड ब्रेव्हिस मैदानाता आला आणि त्याने इम्पॅक्ट पाडला. तो बाद झाल्यानंतर सामन्यात रंगत आली. मुंबईला अखेरच्या १२ चेंडूत विजयासाठी २७ धावांची आवश्यकता होती. एकोणिसाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने षटकार ठोकला पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. आता १० चेंडूत २१ धावांची आवश्यकता होती. मग पुढच्या दोन चेंडूवर १-१ धाव काढण्यात मुंबईला यश आले. सातवा चेंडू निर्धाव गेल्यानंतर ७ चेंडूत १९ धावांची गरज होती. १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीला बाद करून यजमानांनी सामना आपल्या बाजूला फिरवला.

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होत्या. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली आणि मुंबईने ६ धावांनी सामना गमावला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, पण त्याला देखील बुमराहने आपल्या जाळ्यात फसवले. कर्णधार शुबमन गिल (३१), वृद्धीमान साहा (१९), अजमतुल्लाह उमरजई (१७), डेव्हिड मिलर (१२), राहुल तेवतियाने (२२) धावा केल्या. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर गेराल्ड कोएत्झी (२) आणि पियुष चावला (१) बळी घेण्यात यश आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR